सातारा : सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी प्रथमच जूनमध्येच कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामध्ये आता अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
सातारा पालिकेने सुरू ठेवलेली पाणी कपात लवकरच मुख्याधिकार्यांच्या मान्यतेनंतर मागे घेतली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सातारा जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात विशेषत: महाबळेश्वर, कास, बामणोली, पाटण, जावली तालुक्यात मुसळधार पाऊस होऊन ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने गुरुवारी सकाळीच भरला आणि येथील नव्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कास तलावात आता तब्बल साठ फूट पाणीसाठा झाला आहे. हे पाणी सातारकरांना वर्षभर पुरत असते. अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावातून दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते. जून मध्येच यंदा पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने कास तलाव भरल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे.