इराणला भारताकडून मदतीची अपेक्षा

by Team Satara Today | published on : 21 June 2025


इराण : इस्रायल आणि इराण युद्ध शिगेला पोहोचलेलं असतानाच आता इराणला भारताकडून मदतीची अपेक्षा असल्याचं समोर येत आहे. 'ग्लोबल साऊथचा आवाज' अशी भारताची जागतिक स्तरावर ओळख असल्याचा उल्लेख इराणने केला आहे. शांतता हवी असलेल्या देशांचा आवाज म्हणून भारताकडे पाहिलं जातं म्हणूनच भारताने इस्रायलवर दबाव आणला पाहिजे, असे मत भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी शुक्रवारी व्यक्त केलं. इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे भारत आणि इस्रायल हे फार पूर्वीपासूनची मित्रराष्ट्र असतानाच आता इराणनेही भारताकडे या प्रकरणात मध्यस्थितीची मागणी केल्याचं दिसत आहे.

 “आम्हाला वाटते की हे (इस्रायलकडून होणारे) हल्ले लवकरात लवकर थांबवले गेले पाहिजेत. हे सारं संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे शक्य आहे”, असे होसेनी यांनी म्हटल्याचे 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. “ग्लोबल साऊथचा आवाज असलेले भारतासारखे देश शांततेचे समर्थक आहेत. त्यांनी समन्वय साधून इस्रायलवर दबाव आणला पाहिजे. पहिले पाऊल म्हणून त्यांनी या कृतीचा (इस्रायलच्या हल्ल्याचा) निषेध केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे पुन्हा घडणार नाही”, असे इराणचे उपराजदूत भारताकडून मदत अपेक्षित असल्याचं अधोरेखित करताना म्हणाले. आता या विनंतीवर भारत काही प्रतिक्रिया देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली सरकार कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम न पाळता, विरोधकांवर हल्ले करून प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही होसेनी यांनी केला आहे. “इस्रायली सरकार आणि अधिकारी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. त्यांचे एकमेव ध्येय प्रादेशिक वर्चस्व मिळवणे आहे. त्या ध्येयासाठी ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे बलिदान देण्यास, त्यांना ठार मारण्यासही तयार आहेत,” असे इराणचे उपराजदूत म्हणाले. 

 “ते (इस्रायल) लोकांना मारतात आणि तरीही स्वतः पीडित असल्याचे म्हणतात. हे हास्यास्पद आहे. इराण शांततेच्या बाजूने आहे आणि जगातील प्रत्येक युद्धाला आमचा विरोध आहे,” असंही इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी देशाची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी नेतन्याहू यांनी त्यांची भूमिका मोदींसमोर मांडली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या जी-7 देशांच्या परिषदेतही इस्रायल-इराण विषयावर चर्चा झाल्याचे समजते. यामध्येही पंतप्रधान मोदी सहभागी झालेले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच !
पुढील बातमी
योगा करणं आरोग्यासाठी फायदेशीर

संबंधित बातम्या