लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पुरनिया चौकाजवळील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत १४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मृतांची संख्या १४ वर
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी या घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मृत पावलेल्यांमध्ये बहुतांश तरुण मुला-मुलींचा समावेश असल्याचे समजते, जे आग लागली तेव्हा इमारतीमध्ये उपस्थित होते. धुराच्या साम्राज्यामुळे इमारतीत नेमके किती लोक अडकले आहेत, याबाबत बराच वेळ संभ्रम होता.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न
आग लागताच संपूर्ण इमारतीत वेगाने धूर पसरला. हे पाहून स्थानिक लोकांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीने बघता बघता विक्राळ रूप धारण केले होते. दुर्घटना घडली तेव्हा कोचिंग सेंटरमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आगीच्या ज्वाळा आणि धूर पसरताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये एकच पळापळ झाली. सर्वत्र किंचाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अजूनही काही जण आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊमधील या आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे."उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःखी आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे होवोत हीच प्रार्थना. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन सर्व शक्य ती मदत करत आहे," असे पंतप्रधानांनी 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.पंतप्रधान कार्यालयाने (PMO) 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'मधून (PMNRF) ही मदत जाहीर केली आहे. त्यानुसार, प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
इमारतीवरून उड्या मारलेल्या जखमी रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यादुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री पाठक यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, "इमारतीमधून सुखरूप बाहेर पडलेल्या ३ ते ४ मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी अद्यापही वॉशरुममध्ये अडकले होते. त्यामुळे आम्ही प्रत्येक खोलीची आणि वॉशरुमची कसून तपासणी केली. रुग्णालये, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकांना तात्काळ सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून खाली उड्या मारलेल्या काही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.