मुंब्र्यात लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू

अनेक प्रवासी जखमी

by Team Satara Today | published on : 09 June 2025


मुंबई : मुंबईमध्ये एका विचित्र अपघातामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही विचित्र घटना घडली आहे. 'पुष्पक एक्सप्रेस'मधून 10 ते 12 प्रवासी खाली पडले आहेत. यापैकी पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रवासी दाराजवळ उभे राहून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक ही घटना घडली. मुंबईहून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसखाली हे प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रुळावर अनेक प्रवासी पडले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी नेमके कोणत्या ट्रेनने प्रवास करत होते याची माहिती समोर आलेली नाही.

अपघात झाला तेव्हा मुंब्रा रेल्वे स्थानकात उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने फास्ट ट्रॅकवरुन जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून हे प्रवासी खाली ट्रॅकवर पडले. हे सर्व प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून दाराला लटकून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक हे सर्वजण लोकल ट्रेनमधून खाली पडल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दिवा रेल्वे स्थानकाजवळ 2 महिला प्रवासी पडल्याची अधिक माहिती मिळते असून नेमके कोणत्या डब्यातून आणि कोणत्या कारणाने हे प्रवासी पडले याची माहिती समोर आलेली नाही.

मध्य रेल्वेमध्ये ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर गेल्या 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 या 15 महिन्यांमध्ये 663 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अनेक जण धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे मरण पावले आहेत. या काळात रेल्वे रुळ ओलांडताना 391 आणि धावत्या रेल्वेतून पडून 272 जणांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वेतून पडणे, रुळ ओलांडणे, तसेच गर्दीमुळे पडणे या कारणांमुळे प्रवाशांचे मृत्यू होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये अनेक लोकांचा अशाप्रकारे लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. प्रवासात नेहमी सावध राहावे, रेल्वे रुळ ओलांडू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी विचारपूर्वक प्रवास करावा. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेकडून वारंवार केले जाते.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली ही रेल्वे स्थानके येतात. तर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड आणि जुचंद्र ही रेल्वे स्थानके येतात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा ही रेल्वे स्थानके येतात. या रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील अपघात संबंधित पोलीस ठाण्यात नोंद होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
पुढील बातमी
राज्यातील घाट रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

संबंधित बातम्या