नवरात्रीचे ९ दिवस म्हणजे सगळीकडेच आनंद आणि उत्साहाचे वातावरण. या ९ दिवसांच्या काळात तर महिला वर्ग विशेष उत्साहात असतो. कारण त्यांच्यामागे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची खूप लगबग असते. कुंकूमार्चन, कुमारिका पुजन, कुलाचार, भजन असे कित्येक कार्यक्रम या दिवसांत केले जातात. हे सगळं करतानाच अनेकजणी ९ दिवसांचे उपवास करतात. एकीकडे कामांची धावपळ आणि दुसरीकडे उपवास, या दोन्ही गोष्टी सांभाळून जर तब्येतही जपायची असेल तर नवरात्रीचे उपवास करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.
१. नवरात्रीचे उपवास याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा असं सांगतात की नवरात्रीच्या उपवासाच्या काळात साबुदाणा खाण्याचा अतिरेक टाळा. त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर लगेचच एनर्जेटिक वाटत असलं तरी तेवढीच लवकर अंगातली साखर कमी होते आणि थकून गेल्यासारखं वाटतं.२. उपवास करताना आपण जास्तीतजास्त प्रमाणात कार्ब्स खातो. त्यामुळे प्रोटीन्सचे प्रमाण कमी झाल्यानेही थकवा येतो. म्हणूनच नवरात्रीच्या काळात उपवास करताना अधिकाधिक प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करायला हवा.
३. एकच एक पदार्थ रोज खाऊ नका. कधी भगर, राजगिरा, बटाटे, रताळे, भाजणीचे थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ तुमच्या आहारात असायला हवे. सगळे पदार्थ खाल्ले तर जास्त पोषण मिळेल.
४. उपवासाच्या प्रत्येक पदार्थात बटाटा घालू नका. जर बटाटा तुम्ही रोजच आणि सगळ्याच पदार्थांमध्ये घालत असाल तर त्यामुळे शरीरातलं स्टार्च वाढतं. शरीरातलं स्टार्च वाढल्याने शुगर वाढण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बटाट्याचा वापरही मोजक्याच पदार्थांमध्ये करा.
५. उपवासाचे पॅकफूड बाजारात भरपूर प्रमाणात मिळते. हे पदार्थ टाळायला हवे. कारण त्या पदार्थांमधून गरजेपेक्षा जास्त तेल, मीठ, इतर प्रिझर्व्हेटीव्ह शरीरात जातात, जे आरोग्यासाठी हानिकारकच असतात.