सातारा : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या एका वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव पुणे, नागपूर येथील वन विभागाने मुख्यालयाला पाठवला होता. मुख्य वन्यजीव रक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे.
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली विभागात आधीच दोन पट्टेरी वाघ आहेत. बार्शीतील पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यास या प्रकल्पातील वाघांची संख्या तीन होणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाघ नर असणार आहेत. बार्शी परिसरात वाघाचा अधिवास नसून, त्याला पुरेसे खाद्यही उपलब्ध नाही, पाळीव जनावरांवरील हल्ले टाळण्यासाठी त्याला तेथून हलवणे यथोचित ठरेल, असे स्पष्टीकरण वन विभागाने दिले आहे.
हा वाघ टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बार्शी तालुक्यामध्ये दाखल झाला आहे. त्याने 500 किलोमीटर अंतर पार केले असून, बार्शी ते धाराशिव परिसरात त्याचा वावर आहे. बार्शीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असल्याने, त्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अचानक वाघाचे दर्शन घडले होते.
दरम्यान, बार्शी परिसरात वाघांसाठी आवश्यक अधिवास नाही, पुरेसे नैसर्गिक खाद्यही उपलब्ध नाही. त्यामुळे वाघ पाळीव प्राण्यांची शिकार करण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणारा संघर्ष टाळण्यासाठी आम्ही वाघाला दुसरीकडे हलवण्याचा विचार केला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच विदर्भातून वाघ आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या वाघालाही तिथे सोडता येऊ शकते. नागपूर येथून प्रस्तावावर निर्णय झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती पुणे वनविभागाने दिली आहे.
बार्शी परिसरात वाघाने मुक्काम ठोकला असून, गावाबाहेर फिरणार्या नागरिकांना तो दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाने एका गावात शेतातील गोठ्यात शिरुन गाईची शिकार केली होती. बार्शीच्या विविध भागांत पट्टेरी वाघ फिरतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडल्यास त्याला पुरेसे खाद्य आणि नैसर्गिक अधिवास मिळणार असल्याचे वन विभागाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. नागपूर येथून प्रस्तावावर निर्णय झाल्यामुळे वाघाच्या स्थलांतराची प्रक्रिया आता वेगाने होणार आहे.
बार्शी येथे फिरणार्या वाघाला पकडण्यासाठी सोलापूर, धाराशिव आणि ताडोबा येथील वन्यजीव विभागाच्या टीम कामाला लागल्या आहेत. वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे मुख्य वन्यजीव रक्षकांचे आदेश झाल्यानंतर त्यांची जबाबदारी वाढली असून नागरिक, पाळीव प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी तसेच भटकलेल्या वाघाचा भूकबळी जाऊ नये, या सर्व बाबींची ही टीम काळजी घेत आहे.