सातारा : छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य पराक्रमाची आणि त्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची सफर केंद्र सरकारची भारत गौरव ट्रेन घडवणार आहे. दिनांक 9 ते 14 जून या दरम्यान ही ट्रेन धावणार असून या ट्रेनसाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पर्यटन व ऐतिहासिक ज्ञानग्रहण असा समन्वय या माध्यमातून साधला जाणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत गौरव टूरिस्ट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्षेत्राने पुनीत झालेल्या परिसराची परिक्रमा करण्यासाठी धावणार आहे. या ट्रेनमध्ये इकॉनॉमी, आरामदायी आणि सुपीरिअर असे तीन प्रकार असून त्यांची तिकिटे अनुक्रमे 13 हजार 155, 19 हजार 480 आणि 27 हजार 365 अशी आहेत. या खर्चात मुक्काम, गाडी मधील गाडी बाहेरील शाकाहारी जेवण, नाश्ता, ऐतिहासिक ठिकाणांचा भेटीचा प्रवास, रोपवे चार्जेस, ट्रेनची सुरक्षा प्रवाशांचा प्रवासी विमा, इतर सर्व प्रकारचे दर या शुल्कात लागू आहेत. ही ट्रेन दिनांक 9 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता दादर मुंबई आणि ठाणे या ठिकाणी थांबून कोकण रेल्वेने माणगाव येथे जाणार आहे. तेथून किल्ले रायगड दर्शन झाल्यानंतर पुणे येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. 10 जून रोजी पुणे येथील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहिल्यानंतर दुसरा मुक्काम पुणे येथेच राहणार आहे.
दिनांक 11 जून रोजी किल्ले शिवनेरी तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या श्रीक्षेत्र भीमाशंकर चे दर्शन होणार आहे. तिसरा मुक्कामही पुण्यात असणार आहे. दिनांक 12 रोजी सातार्यामध्ये गौरव ट्रेनचे आगमन असून येथे प्रतापगड दर्शन झाल्यानंतर शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे ही ट्रेन रवाना होणार आहे. दिनांक 13 रोजी या ट्रेनचे कोल्हापुरात आगमन होऊन येथे महालक्ष्मी मंदिर दर्शन, किल्ले पन्हाळा दर्शन होणार आहे. त्याच दिवशी रात्री आठ वाजता ही ट्रेन मुंबईकडे परतणार आहे. पाचवा मुक्काम कोल्हापूर ते मुंबई या रेल्वे प्रवासातच असेल. दिनांक 14 रोजी पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे भारत गौरव ट्रेन परतणार आहे. येता-जाता दादर आणि ठाणे या ठिकाणी प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश किंवा उतरणे शक्य होणार आहे. छत्रपतींचे वास्तव जीवन कार्य चरित्र आणि त्यांचा अलौकिक वारसा पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवणे हा एक समृद्ध ठेवा आहे. याचा सर्व प्रवाशांनी घ्यावा तसेच या भारत गौरव ट्रेनला पर्यटकांचा निश्चित प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.