सातारा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, अन्वर पाशा खान, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
शासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर चुकीची वेळ आलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. पीक विमा योजनेतही घोटाळा झालेला आहे. याची सखोल चौकशी करावी. महिला आणि मुलीवर अत्याचार वाढत आहेत. यातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या पीक उत्पादनाला हमीभाव मिळायलाच हवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या.