सातारा : महामाता भिमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार्टीचे प्रवक्ता अमर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हलगी वाजवून चक्री उपोषण सुरु केले आहे.
सदर बझार, सातारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भिमाई आंबेडकर यांची समाधी आहे. याठिकाणी छोट्या शेडवजा इमारत होती. त्याठिकाणी शेड काढून इमारतीचे काम सुरु करण्यात आले. मात्र, ते संथगतीने सुरु असताना आता बंद आहे. याबाबत आर्थिक अडचणी असल्याने शासनाने सदरची जागा ताब्यात घेऊन भिमाई स्मारक उभारावे व त्याचे लोकार्पण करावे. ऐतिहासिक सातारा शहर हे महात्मा जोतीराव फुले यांची कुलभूमी असून शहरात अद्याप महात्मा फुले व बहुजन उध्दारक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज या दोन महामानवाचे पूर्णाकृती पुतळे बसवण्यात यावेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. महाराष्ट्र भूषण शाहीर पुंडलिक यांचे स्मारक शहरात उभारावे, या मागण्यांसाठी चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे. यावेळी रावण गायकवाड, प्रा. अरुण गाडे, प्रा. खराडे, अनिल वीर, विलास वाहगावकर, श्रीरंग रणदिवे, अविनाश तुपे उपस्थित होते.
भिमाई आंबेडकर स्मारकराचे काम गतीने करा
डेमोक्रॉटिक पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण
by Team Satara Today | published on : 26 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा