मेढा : राज्यातील सर्वसामान्य घरातील महिलांना आधार देण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. यामुळे बहिणींचे आशीर्वाद कायम शिवसेनेच्या पाठीशी आहेत. विरोधकांनी कितीही टीका-टिप्पणी केली, तरी ही योजना कधीही बंद होणार नाही," असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, केळघर विभागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला बोंडारवाडी धरणाचा प्रश्न आपणच मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुसुंबी गटातील शिवसेनेच्या उमेदवार कविता ओंबळे, कुसुंबी गणातील उमेदवार सुनीता दुंदळे व आंबेघर गणातील उमेदवार आतिष कदम यांच्या प्रचारार्थ केळघर येथे आयोजित सभेत ना. शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात जावळीशी असलेल्या नात्याला उजाळा दिला. ते म्हणाले, "जावळी ही माझी जन्मभूमी आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या खोऱ्यात पर्यटनाला मोठी संधी आहे. मेढा आणि केळघर भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर असून, 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना इथेच रोजगार मिळेल. पोटापाण्यासाठी मुंबई, पुणे, ठाण्याची वाट धरावी लागणार नाही."
विरोधकांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, "मी घरात बसून कारभार करणारा नाही, तर जनतेत जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री असताना सामान्य लोकांसाठी अहोरात्र काम केले आहे, याची जाणीव जनतेला आहे. जावळीच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधी दिला आहे. मी टीकेला महत्त्व देत नाही, तर माझ्या कामातून विरोधकांना उत्तर देतो."
यावेळी बोलताना सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी सांगितले की, "हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रलंबित प्रश्न ना. एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला असून, त्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मेढा-केळघरच्या विकासासाठी त्यांनी सतत सहकार्य केले असून बोंडारवाडी धरणाचा प्रश्नही ते नक्कीच सोडवतील." माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांनीही यावेळी उपस्थितांना जावळीच्या भूमिपुत्राच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभेला माजी आमदार दगडू दादा सपकाळ, नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, संपर्क प्रमुख शरद कणसे, रेश्मा जगताप, रणजितसिंह भोसले, माजी सभापती बापूराव पार्टे, आरपीआयचे अध्यक्ष संजय गाडे, चंद्रकांत जाधव, साहिल शिंदे, शांताराम कदम, समीर गोळे, आनंदराव जुनघरे, अशोक संकपाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.