आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या निर्णयाप्रमाणे

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

by Team Satara Today | published on : 22 May 2025


सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीचे तिन्ही नेते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने लढवल्या जातील. आम्ही सुद्धा महायुती बरोबरच ठामपणे आहोत. याशिवाय संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासंदर्भात जी चर्चा सुरू आहे ती केवळ चर्चाच आहे. सध्या प्रत्यक्षात तसे काही नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. 

येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, आमदार सचिन कांबळे पाटील, सातारा जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे इत्यादी उपस्थित होते. 

तटकरे पुढे म्हणाले, 2014 पासून आमच्यात भाजपबरोबर जाण्याचा प्रवाह होता. नेतृत्वाची संमती होती, पण पुढे तसे काही होऊ शकले नाही. 2023 मध्ये एनडीए बरोबर गेलो. हा निर्णय योग्य ठरला आहे. राज्यात सत्तेवर आलो असून महाराष्ट्राला गती देण्याचे काम करत आहोत. यासाठीच पक्षाची पुनर्बांधणी करत असून ताकद वाढवली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकांच्या तुलनेने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळाले. प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी असते. तरीही निवडणुकीबाबत योग्य वेळी महायुतीतील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ राजकीय समीकरणे तपासून योग्य तो निर्णय घेतील. 

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबत विचारले असता तटकरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मनात वेगळी भूमिका होती. ऐनवेळी सचिन पाटील आले आणि आमदारही झाले. हा घड्याळाचा करिष्मा आहे. यासाठी भाजपच्या माढ्याच्या माजी खासदारांची मदत झाली. विधान परिषदेत रामराजे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत माझा आणि त्यांचा फोन होतो. ते परत येण्याविषयी चर्चा सुरू आहे. रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार म्हणून भारत गोगावले धावा करतात, तसेच शिंदे सेनेचेही ज्यादा आमदार जिल्ह्यात आहेत, असे सांगण्यात येते या प्रश्नावर तटकरे म्हणाले, पालकमंत्री पदाबाबत विलंब झालाय असे स्पष्ट करतानाच मी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि त्यातच रायगड जिल्ह्यातील असल्याने माजी तटस्थ भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आमदारांची आकडेवारी मला पाठ आहे, असे सांगून त्यांनी मंत्री गोगावले यांना एक प्रकारचा टोला लगावला. 

राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या घरातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर तटकरे यांनी हगवणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, त्यांचे निलंबन झाले आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशा नराधम प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात, असेही ते ठामपणे म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दलिया सुपरफूड : हृदय, पचन आणि त्वचेसाठी उपयुक्त
पुढील बातमी
मॉन्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच अवकाळी ने केले कोट्यवधीचे नुकसान

संबंधित बातम्या