अयोध्या : अयोध्यातील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कामे वेगाने सुरु आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण केली जात आहे. राम मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आहे. मंदिराचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. या मंदिरासाठी मागील पाच वर्षांत 400 कोटी रुपयांचा कर सरकारला भरला आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची मणिराम दास छावनीमध्ये बैठक झाली. त्यानंतर चंपत राय यांनी ही माहिती दिली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात 7 ट्रस्टी आणि 4 विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. बैठकीत राम मंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की 5 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रस्टची निर्मिती झाली होती. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षांत ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना 396 कोटी रुपयांचा कर दिला आहे.
ट्रस्टने जीएसटी 272 कोटी, टीडीएस 39 कोटी, लेबर सेस 14 कोटी, ईएसआय 7.4 कोटी, विमामध्ये 4 कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला 5 कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप शुल्क 29 कोटी, 10 कोटी वीज बिल, 14.9 कोटी रॉयल्टच्या माध्यमातून सरकारला दिले गेले आहे. त्यात दगडांची रॉयल्टी राजस्थान सरकार, कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे.
5 वर्षांत मंदिर निर्मितीवर 2150 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा सर्व निधी ट्रस्टला समाजाकडून मिळाला आहे. सरकारने कोणतीही मदत दिली नाही. 5 वर्षात विविध दात्यांनी 944 किलो चांदी दिली आहे. दानात आलेली ही चांदी 92 टक्के शुद्ध आहे. जूनमध्ये मंदिर निर्माणचे काम पूर्ण होणार आहे.