‘बिग बॉस मराठी ४’ अभिनेता किरण मानेंनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेले किरण माने सध्या कमालीचे चर्चेत आले आहेत. ते एक प्रसिद्ध अभिनेता असून ते राजकारणातही सक्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री मारली आहे. नेहमीच आपल्या अभिनयातून चर्चेत राहणारे किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही तासांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
येत्या २९ डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात अभिनेते किरण माने यांचा ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात,
“हॅलो किरण माने सर… संदीप ससाणे बोलतोय. ‘अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त यावर्षीपासून ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ सुरू करतोय… पहिलाच पुरस्कार तुम्हाला द्यायचा यावर आमच्या निवड समितीचं एका क्षणात एकमत झालं. तुमच्या होकाराची अपेक्षा आहे.”
काय उत्तर द्यावं सुचेनाच. आनंदानं मन भरून आलं. डोळे पाणावले. ‘अण्णाभाऊ-निळूभाऊ’ म्हणजे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला समृद्ध करणारे माझे आदर्श ! निळूभाऊंना तर मायणीच्या तंबूत पाहिलेल्या ‘पिंजरा’ पासून परिवर्तनाच्या चळवळीतल्या भाषणांपर्यंत मी वेड्यासारखं ‘फॉलो’ केलं… नंतरच्या काळात मला अल्पकाळ का होईना सहवास लाभला. चक्क सातारच्या माझ्या घरीही ते आले !
निळुभाऊंच्या नावानं पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही… कळाल्यापासनं हवेत तरंगतोय… आजपर्यंत ज्या-ज्या अवॉर्डमधनं कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शुन्य करून टाकणारा हा बहुमान आहे ! मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नांव आहे, त्या नावानं असलेला पुरस्कार हा मी तेवढ्याच रूबाबात आणि टेचात स्विकारणार.
…कारण माझा संघर्ष मला सांगतोय… अभिनयासाठी मी खाल्लेल्या खस्ता मला सांगतायत… शिवशाहुफुलेआंबेडकरी विचारांचा प्रसार करतो म्हणून इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ मला सांगतेय… त्यावेळचे माझ्या आईवडीलांच्या डोळ्यांतले अश्रू मला सांगतायत… की हो, मी हा पुरस्कार डिझर्व करतो !
निळूभाऊ, तुमच्यासमोर मी कायम नतमस्तक आहे, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत राहीन… तुम्ही आणीबाणीच्या काळात नागपूरच्या चौकात निडरपणे केलेलं भाषण असो… परिवर्तनाच्या चळवळीत केलेली व्याख्यानं असो… तथाकथित धर्मांध संस्कृतीरक्षकांना झुगारून केलेले ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग असोत… ‘कोण म्हणतं टक्का दिला’ सारखं दलित चळवळीच्या विचारांचं नाटक प्रोड्यूस करणं असो… ‘अभिनेत्याला समाजभान नसेल आणि भवताली घडणार्या अराजकावर बोलण्याचा निडरपणा नसेल, तर त्याची कला पोकळ आणि क्षुद्र ठरते’, हे तुम्ही मला शिकवलंय आणि मी ते शंभर टक्के अंगीकारलंय !
सलाम निळुभाऊ.”