सातारा : छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयाचे पूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर स्थळी झालेल्या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव,जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण केले. यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. सध्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिंचनासह विद्युत निर्मितीचा प्रश्न मिटला आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात याचा लाभ होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.