सातारा : राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या आंतरिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या अद्वितीय यशाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमध्ये शंभर दिवसाचा अंतरिक मूल्यमापन कार्यक्रम जाहीर केला होता. या मूल्यमापन मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, सहाय्यक आयुक्त, पोलीस आयुक्त,विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार होते. कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता तक्रार निवारण कार्यक्षमता, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, इत्यादी नाविन्यपूर्ण निकषावर आंतरिक मूल्यमापन करण्यात आले. या आंतरिक मूल्यमापनामध्ये राज्यातून सातारा पोलीस मुख्यालयाला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी सातारा पोलिसांच्या यशाचे अभिनंदन केले आहे. अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये सातारा पोलिसांनी, प्रशासकीय गुणवत्ता, संकेतस्थळे, सेवा विषयक बाबी आणि कर्मचारी प्रशिक्षण या चार मुद्द्यांवर बाजी मारली आहे. गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस दलाचे विशेष अभिनंदन केले आहे. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी शंभर दिवसाची विशेष मोहीम पूर्ण होणार आहे. यापुढेही लोककल्याणाकरता सातारा पोलीस मुख्यालयाचे काम अशाच पद्धतीने चालू राहो, अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.