सातारा : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत डॉ. सुखदेव थोरात, जीवन गौरव पुरस्कार रामभाऊ जाधव, नवोदित साहित्यिक पुरस्कार नारयण जावलीकर यांना घोषित झाले असून शुक्रवार दि.९ मे रोजी दुपारी १२ वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सातारा येथे शारदा आश्रमाच्या प्रांगणात प्रदान केले जाणार आहेत.
याबाबत संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार जाहीर केले. पुरस्काराबाबत माहिती देताना देताना त्यांनी सांगितले की आम्ही मागील ३४ वर्षापासून फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार देत असून यंदाचा म्हणजेच ३५ वा पुरस्कार हा डॉ. सुखदेव थोरात यांना देत आहोत. यापूर्वी हे पुरस्कार रा. ग. जाधव यांच्यापासून ते पत्रकार निखिल वागळे अशा अनेक मान्यवरांना दिलेला आहे. मागच्या १० वर्षापासून संस्थेने नवोदित साहित्य पुरस्कार देण्यास सुरूवात केली असून यंदाचा पुरस्कार साताऱ्यातील वैचारिक चळवळीतील लेखक नारायण जावलीकर यांना जाहीर केला आहे. यापूर्वी हा पुरस्कार किसन चव्हाण प्रशांत वंजारे यांच्यापासून ते अरुण जावळे यांच्यापर्तच्या साहित्यिकांना दिलेला आहे. या पुरस्काराप्रमाणेच भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला जीवन गौरव पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत १७ मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखक रामभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय. यापूर्वी हा पुरस्कार नामदेव ढसाळ, सुषमा अंधारे यांच्यापासून ते हरिदास जाधव यांच्यापर्तंच्या मान्यवरांना देण्यात आला होता.
फुले-आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकार, लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था या पुरस्काराच्या माध्यमातून आजवर घेत आलेली आहे. स्वतंत्र समता, बंधुता ही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी परिवर्ननाची लढाई अशीच सुरू रहावी यासाठी समाजात विशेष योगदान देणाऱ्यांचा गौरव करणं हा प्रमुख उद्देश ठेवून पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने ३४ वर्षांपासून जपली आहे, असेही पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नारायण जावलीकर, हरिदास जाधव, रामभाऊ जाधव, मच्छिद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. वरील तिन्ही मान्यवरांची निवड संघटनेच्या निवड समितीने केली असून शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. ९ मे रोजी दुपारी १२ वाजता पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.