यवतेश्वर घाटातील धोकादायक दगड बांधकाम विभागाने हटवला

जय्यत बंदोबस्तामध्ये दगड हटवताना रस्त्याला खड्डा

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटामध्ये डोंगर कड्यावर येऊन थांबलेला दगड सार्वजनिक बांधकाम विभागाने पोकलेन च्या साह्याने हटवला. ही कारवाई सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास करण्यात आली. यावेळी संपूर्ण घाटाचा परिसर तसेच दरी मधील गावांकडे जाणारे मार्ग सील करण्यात आले होते. सातारा महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे डोंगर क्षेत्रामध्ये सातत्याने दरडी कोसळत आहेत. सातारा शहराजवळ असणार्‍या यवतेश्वर घाटातही दरड कोसळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आली होती. त्यांच्या निर्देशाप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तात्काळ कारवाई करून सांबरवाडी लगतच्या डोंगर उतारावरील धोकादायक दगड हटवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. तसेच घाटाच्या दरीमध्ये असणारे दरे गाव व मोरे कॉलनी परिसर येथील दळणवळण पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी सांबरवाडी पठाराच्या बाजूने पोकलेन डोंगरावर चढवून कड्यावर येऊन थांबलेला महाकाय दगड तेथून हलविला. तो दगड नियंत्रित परिस्थितीमध्ये दरीमध्ये ढकलून देण्यात आला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून दोन पोकलेन आणि महसूल विभागाचे 20 कर्मचारी यांनीही कारवाई केली. महसूल विभाग आणि बांधकाम विभागाच्या  पथकाने या कामाची पूर्णपणे पाहणी केली. सातारा तालुका पोलिसांचा यावेळी जय्यत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डोंगरकड्यावरचा हा दगड अयोग्य पद्धतीने हटवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केला आहे. हा दगड कट करून अथवा जाग्यावर मर्यादित स्वरूपात फोडून हटवणे शक्य होते. दगड ढकलून दिल्याने यवतेश्वर घाटातील रस्त्याचे नुकसान झाले. येथे रस्ता खचला आणि संरक्षक कठड्याचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र यवतेश्वर घाटातील दरड प्रवण क्षेत्र आता सुरक्षित झाले असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. सातारा-कास दरम्यान असणार्‍या यवतेश्वर घाटात आणखी कोणते भाग धोकादायक आहेत, याचे सर्वेक्षण करून त्याची यादी बनवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धा
पुढील बातमी
वाई पंचायत समितीमध्ये वेळेत पेन्शन मिळत नसल्याची तक्रार

संबंधित बातम्या