सोलरसाठी जास्तीचे पैसे देऊ नयेत

महावितरणचे आवाहन

by Team Satara Today | published on : 21 April 2025


सातारा : सोलर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट, वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत. त्या सर्व तक्रारींची महावितरण दखल घेत असून, शेतकऱ्यांनीही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ सुरु आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारच्या ‘कुसुम-बी’ योजनेतून सौर पंप आस्थापीत केले आहेत. अनुसुचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना ९५ टक्के, तर इतर वर्गवारीतील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानातून सौर पंप मिळतात. त्यासाठी तीन अश्वशक्तीला (एचपी) अनुसुचित जाती व जमातीकरिता ११४८६ रुपये, इतरांकरिता २२९७१ रुपये, पाच अश्वशक्तीसाठी अनुक्रमे १६०३८ रुपये व ३२०७५ रुपये आणि ७.५ अश्वशक्तीला २२४६५ रुपये व ४४९२९ रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलारपंप आस्थापित करण्यापासून त्याचे कार्यान्वयन, देखभाल दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमे व्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही.

शेतकऱ्यांनीही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास सातारा मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता वहिदा बागवान यांच्या ९०२९१६८५१८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. तसेच सोलर कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन मोटर सायकलच्या अपघातात एकजण ठार, एक गंभीर
पुढील बातमी
नॅशनल हेराल्ड केस संदर्भात काँग्रेस घेणार ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा

संबंधित बातम्या