सातारा : दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागून आठ दिवस उलटले आहेत. अकारावी प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणी सुरु आहे. अकरावी प्रवेशाचा बिगुल वाजला असून शून्य ते पहिली कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दि. 21 मे रोजी पहिली कॅप फेरी जाहीर होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी 34850 असून त्यांच्यासाठी जिल्ह्यातील 211 कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपलब्ध प्रवेश क्षमतेसाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 211 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत141 तुकड्यांमध्ये 15 हजार 670, वाणिज्य शाखेत 135 तुकड्या व 12 हजार 70 तर विज्ञान शाखेत 163 तुकड्यांमध्ये 21 हजार 800 अशी एकूण 49540 प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियत शून्य फेरीमध्ये दि.8 ते दि. 10 मे प्रवेश अर्जाचा भाग 1 भरणे, दि.11ते 15 मे प्रवेश अर्ज भाग 2 भरण्यात आला होता. दि. 15 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली होती.
दि. 18 ते 19 मे या गुणवत्तायादीवर विद्यार्थी हरकती, दुरुस्ती, दि. 20 मे पहिल्या फेरीसाठी प्रवेश कोटा जाहीर होणार आहे. दि. 21 मे रोजी पहिली नियमित कॅप फेरी होणार असून सकाळी 8 ते 22 मे सायंकाळी 6 पर्यंत प्रवेश अर्जातील बदल, पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे दि. 23 ते दि. 26 मे अलॉटमेंट, दि. 26 मे पहिल्या कॅपमधील कनिष्ठ महाविद्यालयांची यादी , विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे, मिळालेल्या महाविद्यातील प्रवेश फेरीचा कटऑफ जाहीर करणे, दि. 26 ते दि. 28 मे कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चिती, प्रवेश नाकारणे. दि.29 मे रिक्त जागा जाहीर करणे, दि.30 मे दुसऱ्या कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत प्रवेश कोट्यासाठी हेच वेळपत्र लागू राहणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.