अंकिता पाटील यांचे यश प्रेरणादायी

पृथ्वीराज चव्हाण : यूपीएससीतील यशाबद्दल कराडवासीयांतर्फे सत्कार

by Team Satara Today | published on : 11 June 2025


कराड : देशातील गुणवंत विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जावेत, हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमागचा उद्देश आहे‌. त्यात अंकिता पाटील यांनी मिळवलेले यश हे अन्य विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

यूपीएससी परीक्षेत ३०३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल अंकिता पाटील यांचा कराडवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील, परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, माजी परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, अशोकराव पाटील, शिवराज मोरे, अरुण पाटील, मनोहर शिंदे, प्रा. सतीश घाटगे, हिंदुराव पाटील आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा मिळाल्या तरच विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळते. अंकिता पाटील यांच्या यशात त्यांचे आई-वडील, नातेवाईक व मार्गदर्शकांचा वाटा आहे. अंकिता यांनी प्रचंड प्रमाणात प्रयत्न केल्याने त्यांना यश मिळाले आहे. महिलांना शिक्षण व समाजात काम करण्याची संधी मिळाली, तर देशाची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. या दृष्टीने अंकिता पाटील यांनी कराड परिसरातील शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.’’

ते म्हणाले, ‘‘देशात एकूण २३ आयआयटी आहेत. लाखो विद्यार्थी आयआयटीच्या परीक्षा देतात. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड ही बनला आहे. मात्र, आयआयटीच्या प्राध्यापकांच्या ४१ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे.’’

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अंकिता पाटील यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करत त्यांचे यश समाजापुढे आदर्शवत असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अंकिता पाटील म्हणाल्या, ‘‘पालकांनी मुलींना प्रोत्साहन दिले पाहिजे. देशाच्या विकासात मुली योगदान देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आकांक्षांना पालकांनी पंख दिले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी संयम व चिकाटी ठेवत मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.’’ विविध संस्था, संघटना, मंडळांच्या वतीनेही सत्कार केला. स्पर्धा परीक्षेच्या विविध ॲकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी प्रास्ताविक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या
पुढील बातमी
ग्रामपंचायतींचा क्युआरने कर भरणा

संबंधित बातम्या