सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेला वेग आला असून गुरुवारी दाखल अर्जांची छाननी पार पडली. त्यानंतर शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सातारा तालुक्यातील शेंद्रे गणातून एका महिला उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात हालचाल निर्माण झाली आहे.
शेंद्रे गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मोनिका अमोल दळवी यांनी शुक्रवारी आपला अर्ज अधिकृतपणे माघारी घेतला. विशेष म्हणजे सातारा तालुक्यातील सर्व उमेदवारांमध्ये माघार घेणाऱ्या त्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट होत असतानाच झालेल्या या माघारीमुळे शेंद्रे गणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या गणात उर्वरित उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उमेदवारी माघारीनंतर संबंधित गणातील प्रचाराला वेग येण्याची शक्यता असून, मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू झाल्याचेही चित्र आहे.