सातारा : अंमली पदार्थांचे उत्पादन व पुरवठा करण्यास कायद्याने बंदी आहे. अंमली पदार्थांचे उत्पादन व पुरवठा होणार नाही याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा गाडेकर यांच्या सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीस विभागाने वर्षभरात केलेल्या कारवाईचा अहवाल पुढील बैठकीत सादार करावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, महाबळेश्वर व पाचगणी हे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यामुळे येथील हॉटेल, रेसॉर्टची वेळोवेळी तपासणी करावी. त्याचबरोबर जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात शासनाचे एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही यासाठी समाज कल्याण विभागामार्फत केंद्र उभारणीचा प्रस्ताव देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीत पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी वर्षभरात अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली.