सातार्‍यात प्रथमच झाली रक्षाबंधनाची पत्रकार परिषद

by Team Satara Today | published on : 19 August 2024


सातारा : भारतीय संस्कृती ही फार प्राचीन आहे. मानवी नातेसंबंध जपणार्‍या राखी पौर्णिमेच्या दिवशी अनेक भाऊ आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतात. हाच धागा पकडून महिलांच्या समस्यांबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ. कांचन सतीश साळुंखे यांनी पत्रकारांना राखी बांधून खर्‍या अर्थाने पत्रकार परिषद परिपूर्ण केली. 
या भावनिक ओलाव्यामुळे पत्रकारही सुखावले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेपत्ता झालेल्या महिला व मुली संदर्भात एक धोरण ठरवणे गरजेचे आहे. कारण, आज स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सरासरी 70 महिला व मुली दर दिवशी कोणत्या तरी कारणाने बेपत्ता होत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाच हजार महिला- मुली हरवल्याच्या लेखी तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. वास्तविक पाहता ही  आकडेवारी असली तरी काहींची नोंद घेतली जात नाही, ही फार गंभीर बाब आहे. आज या विषयावर प्रथमच महिला म्हणून सौ. कांचनताई साळुंखे यांनी आपली भूमिका विषद केली. 
बेपत्ता झालेल्या महिला व मुली आपल्या लाडक्या बहिणीसारख्याच आहेत. या महिला बेपत्ता होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड गैरवापर, कौटुंबिक छळ, चुकीच्या व्यक्तीबरोबर प्रेम प्रकरण, अमिषा, कौटुंबिक आर्थिक चणचण आणि लग्न न होणे हे असू शकतात. यापुढे तरी बेपत्ता महिला मुलींची संख्या कमी होण्यासाठी शासन स्तरावर समुपदेशन केंद्राने काम करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांच्या सूचना आवश्यक असून यासंदर्भात पोलीस यंत्रणे व्यतिरिक्त आणखीन एक समिती स्थापन करून महिलांना न्याय द्यावा. या सामाजिक कार्यासाठी सौ. साळुंखे प्रयत्नशील राहणार आहेत. महाराष्ट्रातील महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक योग्य तो उपाययोजना करणे बाबत राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सातारा येथे झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात झालेल्या कार्यक्रमात निवेदन दिले.  
या महत्वपूर्ण विषयावर वाचा फोडल्याबद्दल अनेक माता-भगिनींनी त्यांचं कौतुक केले आहे. दरम्यान, सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्वच पत्रकारांना राखी बांधून महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आपणही पार पाडावी, अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे सातार्‍यातील सर्व पत्रकार हे महिलांचा आदर करून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करण्यास कटिबद्ध राहतील, असा विश्वास पत्रकारांनीही व्यक्त केला. या भावनिक ओलावा निर्माण करणार्‍या पत्रकार परिषदेमुळे खर्‍या अर्थाने सातार्‍यातील पत्रकार सुखावले होते. अशा पद्धतीने बहिणीने राखी देऊन पत्रकारांना एक खर्‍या अर्थाने एक अनोखी भेट दिल्याची चर्चा पत्रकारांमध्ये सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातव्या मजल्यावर या… हिजबुल्लाह कमांडरला कॉल आला अन् काही मिनिटांत खात्मा
पुढील बातमी
जिल्ह्याला पावसाने झोडपले

संबंधित बातम्या