भरारी पथकाची माणमधील तीन कृषी केंद्रांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 14 June 2025


सातारा : कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत त्रुटी आढळून आल्याने तीन कृषी सेवा केंद्रांच्या दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले. भरारी पथकाच्या या कारवाईने बोगस खते व बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

माण तालुक्यामध्ये जिल्हा भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांच्या विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके माफक दरात व गुणवत्तापूर्ण मिळण्यासाठी जिल्हा पथकप्रमुख कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, मोहीम अधिकारी अशोक मोरे, तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण उदमले यांच्या पथकाने माणमध्ये विविध दुकानांत जाऊन खते, बियाणे, तसेच कागदपत्रांची तपासणी केली.

बियाण्यांचे रेकॉर्ड न ठेवणे, दर फलक न लावणे, रजिस्टर वेळेत न भरणे यासह अनेक त्रुटी आढळलेल्या तीन विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस देऊन विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. खते व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी काढण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना पक्की बिले घ्यावीत, तसेच खताबरोबर इतर कोणत्याही प्रकारचे लिंकिंग केल्यास माण तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे व कृषी अधिकारी किरण उदमले यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दि. गुजराथीच्या सोने तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
पुढील बातमी
पाटण प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे

संबंधित बातम्या