नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील हिंसाचार सातत्याने वाढत आहे. भारत सरकारने याबाबत बांगलादेशकडे अनेकदा आक्षेप नोंदवले आहेत. असे असतानाही हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यावर्षी ८ डिसेंबरपर्यंत २२०० हिंदू आणि अल्पसंख्याकांवर हिंसाचार झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये ११२ हिंदू हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. पाकिस्तान हा भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी देश मानला जातो. असे असूनही, बांगलादेशात पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट जास्त हिंदू हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनीही त्यांच्या उत्तरात सांगितले की, बांगलादेशमध्ये २०२२ मध्ये ४७ हिंदू आणि अल्पसंख्याक तर २०२३ मध्ये ३०२ लोक हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. त्याच काळात पाकिस्तानमध्ये अनुक्रमे २४१ आणि १०३ हिंदूंवर हिंसाचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता भारताच्या शेजारील कोणत्याही देशात हिंदू हिंसाचाराला बळी पडलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
भारत सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली असून बांगलादेशकडे आपली चिंता पोहोचवली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी त्यांच्या उत्तरात, आशा व्यक्त केली की बांगलादेश सरकार हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल. ९ डिसेंबर रोजी परराष्ट्र सचिवांच्या बांगलादेश दौऱ्यातही या मुद्द्याचा पुनरुच्चार करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याशिवाय भारत सरकारने अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचाराचा मुद्दा राजनयिक माध्यमातून उपस्थित केला आहे. जातीय हिंसाचार, पद्धतशीर दडपशाही आणि हिंदूंवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती भारताने पाकिस्तान सरकारला केली आहे. पाकिस्तानमधील हिंदूंवरील हिंसाचाराचा मुद्दा भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरही उचलत आहे.