झारखंड : झारखंडमधील विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. १४ व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे पेपरफुटीची चौकशी आणि राज्य परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी एका विद्यार्थी नेत्याने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'ने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने रांचीतील या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.
जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर विद्यार्थी एकवटले
स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर, विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी रविवारी (दि. २ऑगस्ट) बेमुदत उपोषण सुरू केल आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा महतो यांनी दिला आहे.
विद्यार्थींचा नेमका आक्षेप काय?
वृत्तसंस्था 'एएनआय'शी बोलताना देवेंद्र नाथ महतो यांनी सांगितले की, "५ जुलै रोजी आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. ७ जुलै रोजी राज्यपालांची भेट घेतली, तर ८ जुलै रोजी प्रतिकात्मक पुतळा दहन आंदोलन केले. २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून पुरावे सादर केले, ज्यानंतर अधिकृत कारवाईला गती मिळाली. मात्र, महिनाभर उलटूनही राज्य सरकार आणि आयोग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि हा लढा तीव्र करण्यासाठी बेमुदत उपोषण सूरु केले आहे."