बामणोली : कोयना जल पर्यटन बघण्याचे मला भाग्य मिळाले. या ठिकाणी असणारे स्वच्छ पाणी व सुंदर परिसर पाहून मला आनंद झाला. त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार पर्यटन केंद्राला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मला असे वाटते की येणार्या काळात हे पर्यटन केंद्र लोकांना आनंद देणारे खूप मोठे ठिकाण होईल. महाराष्ट्र सरकार यासाठी आणि या भागातील स्थानिक लोकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले,
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जावली तालुक्यातील मुनावळे या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जलपर्यटनाला भेट देत सहकुटुंब जल पर्यटनाचा आनंद लुटला. महाबळेश्वरला देश- परदेशातील पर्यटक येतात, त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच महाबळेश्वर परिसरातील शेतकर्यांनी अधिकाधिक जैविक शेतीकडे वळावे यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही त्यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, महाबळेश्वर येथे बोलताना राज्यपालांनी शेतकर्यांना जैविक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस विभागाच्या वतीने राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली. राज्यपालांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमवेत चर्चा केली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
