माण-खटावच्या विकासासाठी एकजुटीने काम करुया : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वर्धन कारखाना कार्यस्थळावरील बैठकीत मार्गदर्शन

by Team Satara Today | published on : 13 August 2026


पुसेसावळी : आजपर्यंत माण-खटाव तालुक्याला कोणी विचारात घेत नव्हते; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. माण-खटावला विचारात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय होत नाहीत आणि महत्त्वाची सूत्रे आता याच भागातून हलत आहेत, ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून माण-खटावचा नावलौकिक वाढवूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

वर्धन कारखाना कार्यस्थळावरील एका बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वर्धन कारखान्याचे चेअरमन आ. धैर्यशील कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकुमार मोरे, सी. एम. पाटील, राजवर्धन कदम, नवल थोरात, निलेश जाधव उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, विकासकामांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि जनता यांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आ. धैर्यशील कदम म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवली पाहिजे.

रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, औद्योगिक विकास तसेच तरुणांसाठी उपलब्ध होणाऱ्या संधी या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. गावागावातील प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याला आपले प्राधान्य राहील. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा समतोल विकास झाला पाहिजे, ही आपली भूमिका असून विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

विक्रमशील कदम म्हणाले, पुसेसावळी जिल्हा परिषद गट आदर्शवत गट तयार करण्यासाठी वाटचाल सुरू असून, या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, स्वच्छता, कृषी आणि रोजगाराच्या क्षेत्रात आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. गावागावातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन केले जात असून, उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री शंभूराज देसाई; दिव्यांग बांधवाच्या अडीअचणी सोडविण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
पुढील बातमी
जिल्‍हा बँकेच्‍या सत्तेत्त वाई तालुक्यातील संघटनशक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी; १३४ ठरावांचे गणित महत्त्वाचे ठरणार

संबंधित बातम्या