शरद पवारांच्या सभांकडे जिल्ह्याचे लक्ष

साहेबांच्या रणनीतीवर राहणार उमेदवारांची मदार

by Team Satara Today | published on : 14 November 2024


सातारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दिनांक 15 रोजी सायंकाळी सहा वाजता रहिमतपूर येथे कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी येत असून त्यांची सायंकाळी सहा वाजता तेथे सभा होणार आहे. याशिवाय दिनांक 16 नोव्हेंबर रोजी वाई, कोरेगाव, माण, फलटण विधानसभा मतदार संघामध्ये पवारांच्या सलग चार सभा होणार असून या सभेमध्ये पवार कोणता करिष्मा दाखवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 पवारांच्या सभा म्हणजे राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित, असे समीकरण असल्याने महायुतीचे सुद्धा बारकाईने लक्ष पवारांच्या सभेवर राहणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करण्यासाठी शरद पवार जंग जंग पछाडत आहेत. त्यांनी कराड उत्तर, कोरेगाव, फलटण व तसेच वाई या पाच मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पवारांच्या राजकीय गुगलीचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे सातार्‍यातील त्यांच्या सभांना विशेष महत्व राहणार आहे. वाईमध्ये त्यांनी अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देऊन महायुतीचे आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. तसेच पाटणच्या साहेब विरुद्ध सरकार या पारंपारिक लढतीमध्ये सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. मात्र तो अपक्ष अर्ज कोणाच्या सांगण्यावरून भरला गेला, हे उघड गुपित आहे.

अशा घडामोडींमध्ये सातारा जिल्ह्याची राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार समाप्त होत आहे. तत्पूर्वी दिनांक 15 रोजी सायंकाळी सहा वाजता रहिमतपूर येथे, त्यानंतर दिनांक 16 रोजी वाई येथे दुपारी दोन वाजता, पावणेचार वाजता कोरेगाव येथे. त्यानंतर सहा वाजता माण येथे व सायंकाळी उशिरा फलटण येथे शरद पवारांच्या सलग एका दिवसात चार सभा होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल 56 सभांचे नियोजन शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार अंतिम टप्प्यातील एका जिल्ह्यामध्ये चार सभा पवारांच्या होत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ते कोणता कानमंत्र देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यांची अंतिम सभा नेहमीप्रमाणे दिनांक 18 रोजी बारामती येथे होत आहे. सातार्‍यातील पवारांच्या पावसाच्या सभेने राज्यात चमत्कार घडवला आणि त्यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पवार महायुतीला कसे रोखणार आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट कशी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पश्चिम महाराष्ट्रात आचारसंहिता कालावधीत 19 कोटी 13 लाखाचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
अंगापूर वंदन येथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या