नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवतळलेल्या पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, बठिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर देत अनेक ठिकाणी पाकिस्तानचे हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांना लक्ष्य केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानची लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात सीमाभागात आक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने चोक प्रत्युत्तर रदिले. दरम्यान भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये केवळ दहशतवादी आणि त्यांचे तळ लक्ष्य करण्यात आले, कोणत्याही लष्करी सुविधा किंवा नागरिकांना हानी पोहोचवण्यात आली नाही. परंतु पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
पाकिस्तानकडून उघड चिथावणीखोर कृत्य
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून उघड चिथावणीखोर कृत्य करण्यात आले. पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथील लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयानुसार, या हल्ल्यांना "इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड" आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे यशस्वीरित्या रोखण्यात आले. या हल्ल्यांनंतर अनेक ठिकाणी काही अवशेष सापडले असून ते पाकिस्तानच्या आक्रमणाचे पुरावे आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी या भागांमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून विनाकारण मोर्टार व जड तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. या पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे आतापर्यंत 16 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. यात तीन महिला व पाच बालकांचा समावेश आहे. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर देणे भाग पडले, असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हल्ल्याला ठाम प्रत्युत्तर दिले जाईल : एस. जयशंकर
भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सांगितले की, “जर पाकिस्तानकडून सन्मान राखला गेला, तर भारतीय लष्करही परिस्थिती वाढवण्याची भूमिका घेणार नाही.” आज सकाळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलताना स्पष्ट केले की, “आमचा उद्देश परिस्थिती अधिक तीव्र करणे नाही. परंतु आमच्यावर लष्करी हल्ले झाले, तर त्याला अत्यंत ठाम प्रत्युत्तर दिले जाईल, याबद्दल कोणतीही शंका बाळगू नये.”