भुईंज : राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावानजीक पुणेकडून सातारा दिशेने येताना दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने जागीच ठार झाली. तर पती गंभीर जखमी झाला. दुर्गा विजय जाधव (रा. उपळी, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे, तर विजय महादेव जाधव हे जखमी आहेत. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय जाधव व त्यांच्या पत्नी दुर्गा हे दोघे दुचाकीवरून (एमएच ११ डीआर २३८७) साताऱ्याकडे येत होते. वेळेगावानजीक पाठीमागून आलेल्या कंटेनरने दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरून जाधव दांपत्य रस्त्यावर पडले.
दुर्गा जाधव यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्यांनी त्यांना त्वरित कवठे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. या अपघातातील कंटेनर चालक अनिलकुमार किशोरलाल यादव (रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस हवालदार शिवाजीराव जाधव करीत आहेत.