सातारा : सातारा शहरातील मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा फटका सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे. हीच तक्रार घेऊन शाहूनगर मधील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढून खंडित पाणीपुरवठ्याचा प्रशासनाला जाब विचारला. प्राधिकरणाचे नवीनच बदलून आलेले कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी नागरिकांना दोन दिवस द्या पाणीपुरवठा सुरळीत करतो, असे आश्वासन दिले.
शाहूनगर चे सतर्क सातारकर एडवोकेट सचिन तिरोडकर यांच्यासह नितीन सूर्यवंशी, सुशांत महाजन, संतोष घुले, अजय सोनटक्के, मेंढेगिरी, संजय धोंडवड, उत्तमराव नावडकर, अमोल नलावडे, उमेश गोरे, रमेश जमदाडे, सनी भिसे, अभिमन्यू पवार, प्रकाश घुले इत्यादी नागरिकांनी सोमवारी सकाळी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देऊन अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा जाब विचारला.
यासंदर्भात बोलताना तिरोडकर म्हणाले, गेल्या दीड महिन्यापासून शाहूनगर येथील चारभिंती परिसर, बागडे वस्ती, गोडोली ते अजिंक्यतारा रोड, बागडवाडा, झुंजार कॉलनी, जगतापवाडी येथे अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. एक दिवस पाणी सुरळीत झाले की पुढे चार दिवस पाणीपुरवठ्याचा घोटाळा होत आहे. याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुसळधार पाऊस आणि वारंवार बंद पडणाऱ्या विद्युत मोटारी यामुळे टाक्यांना पुरेशी लेवल मिळत नाही आणि शाहूनगर च्या परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक्सप्रेस फिडर लाईन कार्यान्वित ठेवून त्याचा इमर्जन्सी बॅकअप ठेवावा, अशी तरतूद असते. मात्र प्राधिकरण आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्यात विसंवाद सुरू आहे, हे या निमित्ताने दिसून आले. वाघमारे यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाहूनगर नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.