मुंबई : राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी जवळपास 2 लाख 55 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 60 हजार क्विंटलची आवक झाली. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सर्वसाधारण 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला.
उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1125 रुपयांचा दर मिळाला. नाशिक बाजारात 800 रुपये, सिन्नर बाजारात 1000 रुपये, पैठण बाजारात 900 रुपये, चांदवड बाजारात 970 रुपये, सटाणा बाजारात 115 रुपये, गंगापूर बाजारात 975 रुपये, उमराणे बाजारात 1100 रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात 21000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 750 रुपये दर मिळाला.
धुळे बाजारात या हंगामातील सर्वात कमी असा 240 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर धाराशिव बाजारात 1050 रुपये असा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची बारा हजार क्विंटलचे आवक होऊन सरासरी 900 रुपये दर मिळाला.
बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसत आहे. तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ढोबळ्या मिरचीची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे. मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर बाजारातील मागणी कायम राहू शकते. त्यामुळे दरालाही आधार मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत.
टोमॅटोचा भाव दबावातच आहे. बाजारातील टोमॅटोची आवक सुरळीत सुरु आहे. आवकेचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. तर पुढे टोमॅटोचा उठाव स्थिर आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी 700 ते 1100 रुपयांचा भाव मिळत आहे.