महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश : ना. जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 23 June 2025


पंढरपूर : पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणार्‍या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ना. गोरे बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झाले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातीलही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक, नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती.

पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीमकडे द्यावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले. ना, गोरे म्हणाले, पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार आहे.

तसेच सर्व मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्या, दिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झाले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार आहे. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्तविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्यावतीने येथे येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरमध्ये मुसळधार; वेण्णा ओव्हर फ्लो
पुढील बातमी
फलटण येथे गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा भारतीय बौद्ध महासभा तर्फे भव्य सत्कार

संबंधित बातम्या