नागपूर : अनेक वर्षांच्या लढ्यानंतर अयोध्येत राममंदिर उभे राहिले; पण आता मंदिरातील तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे दुर्दैवाने मंदिररक्षणाचा लढा उभारावा लागत आहे. एसआयटी चौकशीचे नाटक करून चालणार नाही. राममंदिरातील चंदाचोरीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा व जनतेसमोर सत्य येऊ द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
नागपूरच्या रामनगरातील राममंदिरात उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा महाआरती केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी महाविकास आघाडीसोबत गेलो. तेव्हा मला हिंदुत्व सोडले म्हणायचे. आता आमची साथ सोडून गेलेल्या खासदारांनी हिंमत असेल तर राममंदिरातील चोरीवरून भाजपला प्रश्न विचारा, असे आव्हान त्यांनी दिले.
वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत आज आंदोलन
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत पोलिसांनी उचलून नेले. अभिजित दीपके यांना मारहाण केली. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी मुंबईत आंदोलन केेले जाईल, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरे यांचा भागवत, फडणवीसांना सवाल
रामरक्षा म्हणणे हे तुमचे काम आहे, तर रामरक्षा करणे हे आमचे काम आहे, असे म्हणत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तुम्ही लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या, असा सवाल त्यांनी केला. राममंदिरातील तिजोऱ्या फोडल्या जात आहेत, हेच हिंदुत्व अपेक्षित आहे का, असा सवाल त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला.