सातारा : सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे. रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाही.
सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.
सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रेपासून कोल्हापूरकडे जाणार्या रस्त्यावर शुक्रवारी वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेल्याचे पहायला मिळाले.
शेंद्रे ते कागल या 132 किलो मीटर अंतरातील रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहेत. हे काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी डायव्हर्शन आहेत. गेले काही दिवस अवकाळी पावसाचा जोरद असल्याने या रस्त्यांवर चिखल झाला आहे. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेही पडले आहे. डायव्हर्शन व त्यात खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी पुणेकडून कोल्हापूरला जाणारी वाहने धिम्म्या गतीने निघाली होती. खड्डे, चिखल आणि वळणे यामुळे वाहने जागोजागी अडकली होती. यामुळे दोन-तीन किलो मीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी दुपारपासून
कोंडी कायम होती. रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरु आहे. त्यामुळे बोरगाव, नागठाणे, उंब्रज, मसूर येथे नेहमीच वाहनांना संथगतीने जावे लागते. शुक्रवारी तर वाहतूकच ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.