वाई : तालुक्यात शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या पूर्व भागाला बसला. पाचवड ते वेळे दरम्यानच्या महामार्ग परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, तासभर ते दीड तास कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे ठिकठिकाणी झाडे पडली, विद्युत पोल कोसळले. अचानक आलेल्या पावसाने नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या मुसळधार पावसामुळे पाचवड, वेळे, भुईंज, ओझर्डे, शिरगाव या भागांमध्ये नुकसान झाले. पोल कोसळल्याने चार तास बत्ती गुल झाली होती.
ओझर्डे, वेळे आणि शिरगाव परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होते. तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. काही ठिकाणी सिमेंटचे विद्युत पोल कोसळल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. पोल कोसळल्याने अनेक गावांमध्ये तब्बल चार तास बत्ती गुल झाली होती.
यावर नागरिकांनी महावितरण संपर्क साधल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर हा वीस पुरवठा रात्री उशिरा सुरळीत सुरू झाला. झाडांच्या फांद्या घरांवर कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. पूर्व भागात मोठे नुकसान झाल्यामुळे तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, एका ठिकाणी मोठे झाड दुचाकीवर कोसळून वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय, महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचा जोर मोठा असल्याने या पाण्याचा निचरा न झाल्याने महामार्गावर पाणी साचून राहिले. याचा दुचाकी स्वारांना त्रास सहन करावा लागला.