सातारा : औंध उपसा जलसिंचन योजनेसाठी कण्हेर धरणातून सव्वा टीएमसी पाणी आरक्षित झाले असून, राज्यपालांनी या योजनेला मान्यता दिली आहे. पुढील काळात या योजनेला निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंध (ता. खटाव) येथील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन औंध उपसा सिंचन योजनेला निधी देण्याची मागणी केली.
औंध उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. योजना मार्गी लावण्यासाठी महायुती शासन नेहमीच सकारात्मक आहे. औंध जिल्हा परिषद गटातील लोकहिताची विकासकामे मंजूर करून मार्गी लावण्यात येतील.
अर्थमंत्री म्हणून योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याचे शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र माने, माजी उपसरपंच दीपक नलवडे, गणेश देशमुख उपस्थित होते.