मुंबई : अनेक राज्यांमध्ये सध्या हवामानात मोठा बदला पाहायला मिळत आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे, वाढत्या उन्हाचा नागरिकांना मोठा फटक बसत आहे, तर काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर -पश्चिम भारतामध्ये पुढील काही दिवस उष्णता कायम असणार आहे. उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नाहीये, राजस्थानमधील गंगानगरचं तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे.
दरम्यान केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पाऊस जास्त झाल्यास पूर परिस्थितीची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. अवकाळी पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे, पुढील तीन ते चार दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार असून, अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, पावसानं चांगलंच झोडपलं आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळाला आहे.