ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीच्या मागणी; हा अपघात, यामध्ये राजकारण करु नका- शरद पवार यांना अश्रू अनावर

by Team Satara Today | published on : 28 January 2026


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांनी रात्री पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधला. कापऱ्या आवाजात त्यांनी अजित पवारांच्या जाण्यामुळे राज्याची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घ्यावी लागली. 

अजित पवारांच्या निधनानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे", विनंती आणि आवाहन शरद पवारांनी केले. 

महाराष्ट्र एका कर्तृत्वान व्यक्तीला मुकला -शरद पवार

ममता बॅनर्जी यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नावर उत्तर देतानाच शरद पवार अजित पवारांबद्दल बोलताना भावूक झाले.  शरद पवार म्हणाले, "अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्लांना अपघाताबद्दल शंका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अजित पवारांचा मृत्यू अपघातात झाल्याचे मानण्यास नकार दिला आहे. याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, असेही ते म्हणाले आहेत.  ममता बॅनर्जी म्हणाल्या, "अजित पवारांच्या मृत्युची ठोस चौकशी व्हायला हवी. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली व्हायला हवी. अजित पवार हे सत्ताधारी पक्षासोबत होते. कोणीतरी बोलले होते की, ते भाजपाची साथ सोडणार आहेत. त्यानंतर अचानक अपघात होणे, संशयास्पद आहे."

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही अजित पवारांच्या अपघाती मृत्युबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, "एका मोठ्या नेत्याचे अशा प्रकारे जाणे, ही देशाची हानी आहे. या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. विमान कोसळण्याची कारणे स्पष्ट झाली पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दर्जेदार कामावर भर देणारा वक्तशीर राजकारणी - अजितदादा पवार ; महाराष्ट्राला चटका लावणारी एक्झिकट
पुढील बातमी
अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले?; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बिघाड की आणखी काही चर्चांना उधाण

संबंधित बातम्या