सातारा : ऊसाचा गळीत हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकर्यांचे कारखान्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच शेतकर्यांच्या कष्टाची ऊसाची एकरकमी एफआरपी जमा करा. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हीच सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. जिल्ह्यात हक्काचे नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळत असतात. मात्र, गळीत हंगामात कारखान्यांना ऊस घालूनही किरकोळ एफआरपी वर ऊस उत्पादक शेतकर्यांची बोळवण केली जाते. त्यातूनही एकरकमी एफआरपी मिळत नाही. त्यामुळे तुकड्या-तुकड्यांनी शेतकर्याच्या खात्यात आलेले पैसे संपूनही जातात. म्हणून यंदाच्या दिवाळी सणाअगोदर नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर एकरकमी एफआरपी जमा करा. अन्यथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.
कष्टकरी शेतकर्यांच्या उसाचा एकरकमी एफआरपी जमा करा
रयत क्रांती संघटनेची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
by Team Satara Today | published on : 20 October 2024