बांगलादेश : बांगलादेशात 5 ऑगस्टच्या घटनेनंतर राजकीय वातावरण वेगाने बदलले आहे. ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशात सुरु असलेला हिंसाचार थांबला नाही. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) पूर्णपणे सक्रीय झाली आहे. त्यामुळे बांगलादेशात इस्लामी कट्टरपंथींचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी आयएसआयने आपले प्रॉक्सी नेटवर्क कामाला लावले आहे. दरम्यान, बांगलादेशातील वरिष्ठ नेता आणि अवामी लीग पक्षाचे संयुक्त सचिव बहाउद्दीन नसीम यांनी देशात वाढलेल्या हिसांचाराबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
बांगलादेशातील एका अज्ञात ठिकाणाहून बोलताना बहाउद्दीन नसीम यांनी ‘द संडे गार्डियन’ला सांगितले की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे समर्थन असलेले कट्टरवादी आणि अतिरेकी गट देशातील धर्मनिरपेक्ष वातावरण नष्ट करत आहेत. त्यांनी शेख हसीना यांना 5 ऑगस्ट 2024 रोजी पायउतार होण्यास भाग पाडले. हा प्रकार होता. त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती बिघडली, असे नसीम यांनी म्हटले आहे.
नसीम म्हणाले की, 5 ऑगस्टच्या घटनेने जिहादी आणि कट्टरपंथीयांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आहे. आज बांगलादेशात आयएसआय हा पडद्यामागील एक प्रमुख खेळाडू बनला आहे. जो देशाला इस्लामिक कट्टरपंथींसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनविण्याचे काम करत आहे.
बहाउद्दीन नसीम म्हणाले की, आयएसआय आपल्या प्रॉक्सी कट्टरवादी संघटना आणि जमात-ए-इस्लामीचा उपयोग देशाचा इतिहास पुसण्यासाठी केला जात आहे. मोहम्मद युनूस यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले की, त्यांचे बहुतेक सल्लागार अतिरेकी गटांशी संबंधित आहेत किंवा कट्टरपंथी आहेत.
नसीम यांनी जमात-ए-इस्लामी आणि हिजबुत-तहरीर यांच्यावर देशात कट्टरतावादीची निर्मिती करत असल्याचा आरोप केला. तसेच ढाका आणि इस्लामाबादमधील वाढत्या संबंधांवरही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. आयएसआयला 1971 मध्ये पाकिस्तानच्या झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे आयएसआयकडून बांगलादेशी सरकारमध्ये जिहादी घुसवून त्याप्रमाणे कामे ही संघटना करुन घेत असल्याचे नसीम यांनी म्हटले.