सातारमध्ये 6 जून रोजी लॉंग मार्च चा इशारा

रिपाई नेते अशोक बापू गायकवाड यांची माहिती

by Team Satara Today | published on : 02 June 2025


सातारा : भारत ही बुद्धभूमी आहे. मात्र येथे अनेक जाती पंथ असूनही बुद्ध विहाराची केंद्रे ही सनातन यांच्या ताब्यात आहेत. राज्यात तसेच अगदी सातारा जिल्ह्यातही दलितांवर अन्याय सुरू आहे. दलितांच्या सांस्कृतिक अस्मितेवर घाला घातला जातोय. या घटनांचा निषेध करण्यासाठी सातारा भिमाई स्मारक ते चैत्यभूमी दादर मुंबई असा 6 जून रोजी लॉंग मार्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जय भीम आम्ही सातारकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ रिपाई नेते अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ते पुढे म्हणाले, दलित बांधवांच्या सांस्कृतिक आज समितीला खच्ची करण्याचे काम सुरू आहे भिमाई आंबेडकर स्मारकाचे काम बर्‍याच वर्षापासून रखडले आहे. त्यामध्ये तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सदर बाजार येथे जे निवासस्थान आहे ती सदनिका सुद्धा शेवटची घटका मोजत आहे. या निवासस्थानाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळूनही तो प्रश्न प्रलंबित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शालेय शिक्षण येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये झाले. त्या शाळेची अवस्था दयनीय आहे. या शाळेचा साडेतेरा एकरचा भूखंड शासन गिळंकृत करतंय. नव्हे तर तेथील जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप गायकवाड यांनी केला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतातील नव्हे तर जगाची अस्मिता व प्रेरणा आहेत. त्यांच्या संग्रामाच्या, क्रांती आंदोलनांच्या स्मृती काढून टाकण्याचे षडयंत्र देशात बेमालूनपणे सुरू आहे. बिहार येथील महा बौद्ध विहार मुक्ततेसाठी सुद्धा आंदोलन सुरू आहे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भिमाई स्मारक सातारा ते चैत्यभूमी मुंबई असा लॉंग मार्च 6 जून रोजी काढला जाणार आहे. या लॉंग मार्चमध्ये साधारण दोन हजार आंदोलक सहभागी होतील, असा विश्वास अशोक गायकवाड यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटीची 'लवचिक भाडे' योजना सुरू
पुढील बातमी
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या