सातारा : भूमिअभिलेख विभागाच्या वतीने ड्रोन कॅमेर्याच्या साह्याने सातारा जिल्ह्यातील मालमत्तांचे वर्गीकरण प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 502 गावांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मालमत्तेचे डिजिटल नकाशे म्हणजे कायदेशीर वैध पुरावे आहेत त्यामुळे स्वामित्व हक्काचे संघर्ष सुटण्यास मदत होणार आहे या सुविधेबद्दल राज्य शासनाचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय यांच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमात स्वामित्व हक्क योजनेचा डिजिटल शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक तुषार पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वामित्व योजनेस जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहेत. राज्य सरकार मालमत्ता प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी तंत्रस्नेही उपक्रमांचा वापर करत आहे. स्वामित्व योजनेची मूळ सुरुवात पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातून झाली. त्यावेळी पहिल्यांदा डिजिटल नकाशे तयार करण्यात आले. या योजनेची उपयुक्तता बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतासाठी ती योजना लागू केली. जिल्ह्यातील एक हजार 56 गावांपैकी चे 502 गावांच्या गावठाणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, त्याचे डिजिटल नकाशे तयार आहेत. हे डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे आहेत. हे पुरावे न्यायालयात स्वामित्व हक्क संघर्ष सोडण्याकरता उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे जनतेचे मालमत्ता संदर्भातील प्रश्न अचूकपणे सुटणार आहेत. अशा तंत्रस्नेही उपक्रमामुळे राज्य शासनाच्या कामांमध्ये सुलभता येत आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वामित्व हक्क योजनेचा शुभारंभ झाला. देशातील 50 हजार गावातील 54 लाख मालमत्ता धारकांना डिजिटल नकाशांचे वितरण करण्यात आले. या डिजिटल मालमत्ता प्रमाणपत्रांचे प्रयोजन तुषार पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस नागरिकांना डिजिटल मालमत्ता नकाशांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
सातारा जिल्ह्याचा विकास वेगळ्या उंचीवर नेऊ
सातारा जिल्ह्यात पर्यटन, एमआयडीसी, रोजगार, आयटी अशा विविध क्षेत्रांमध्ये कामासाठी प्रचंड वाव आहे. याकरता जिल्हा प्रशासनाची मदत ही महत्त्वाची ठरणार आहे. आपण सर्वांनी मिळून लोकांच्या अपेक्षांना खरे उतरण्याचे प्रयत्न करू. सातारा एमआयडीसी करता प्रशासनाने योजनाबद्द पावले टाकावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी रवाना झाले आहेत. त्या फोरमच्या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला जास्तीत जास्त वाटा मिळावा याकरता नियोजनबद्ध आराखडा तयार होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा प्रचंड आहेत. यावेळी जिल्ह्याच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.