केळघर : जवळवाडी (मेढा) येथील सावडण्याचा विधी करण्यासाठी आलेल्या ५० ते ६० जणांना मधमाशांनी मंगळवारी चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यातील ६ जणांवर मेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तरी इथून पुढे वारंवार अशा घटना होऊ नयेत म्हणून मेढा-मोहाट पुलावरील मधाचे पोळ काढून टाकावे. अशा आशयाचे निवेदन आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सतीश मर्ढेकर, प्रा. प्रकाश जवळ, पांडुरंग जवळ, पांडुरंग मर्ढेकर यांनी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवळवाडी गावातील नागरिकांना सावडण्यासाठी मेढा-मोहाट पुलाखाली जागा आहे. या जागेवर सावडणे करताना अग्नी देताना त्याचा धूर होऊन मोहाला धूर लागत असल्याने मधाच्या पोळ्यावर असणाऱ्या माशा उठून लोकांना चावा घेतात. आज सकाळी जवळवाडी गावांतील ग्रामस्थ गावातील सावडण्याचा विधी करण्यासाठी मेढा-मोहाट पुलाखाली आलेले होते.
त्यावेळी अचानक मधमाशा उठून त्यांनी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांना चावा घेतला. यात ५०ते६०ग्रामस्थ जखमी झाले असून यातील ६ जणांवर मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इथून पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून या ठिकाणी असलेले मधाचे पोळे तातडीने वनविभागाने काढून टाकावे,असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. मेढा:वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मधाचे पोळे काढून टाकावे याबाबत चे निवेदन देताना जवळवाडी ग्रामस्थ.