सातारा : ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा सहन केल्या. प्रसंगी तुरूंगवास भोगला, त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत. भारतातील लोकशाही आणि आणीबाणीच्या कालखंडातील घटनाक्रमांचा मागोवा घेणार्या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना त्यानिमित्त सातार्यातील श्री शाहू कलामंदिर येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री ना. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी आशिष बारकूल, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच आणीबाणीत सहभागीतील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, लोकशाहीचा देदीप्यमान वारसा असणार्या भारतात 1975 साली आणीबाणी लागली. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आली. त्याविरोधात लढा देणार्यांचा शासनाने आदर व सन्मान केला आहे. त्यांना मानधन सुरू केले आहे. या मानधनापासून वंचित असणार्या योद्ध्यांचा शोध घेऊन त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही ना. देसाई यांनी सांगितले. दरम्यान, आणीबाणी काळात तुरुंगवास भोगून लोकशाहीच्या जपणुकीसाठी संघर्ष करणार्या योद्धांचा मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेली सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश पाटील यांनी केले.