सातारा : किल्ले सज्जनगड-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात कचर्यांचे ढिगारे दिसून येत आहेत. कोणी अज्ञाताने हा कचर्याचा ढीग टाकल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कचर्यामुळे परिसरातील वन्य जीवांना धोका असून पर्यटकांसह निसर्ग प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भू भाग हा सह्याद्रीच्या कड्या कपारींनी व्यापलेला तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेला असून बहुविध जैव विविधता या भागात पहावयास मिळते. जिल्ह्यातील पाटण पासून अगदी पाचगणी महाबळेश्वर ला यामुळे पर्यटकांची मांदियाळी असते. याच पट्ट्यात येणारे सज्जनगड हे धार्मिक स्थळ असून याठिकाणी भेट दिल्यानंतर पर्यटक आवर्जून ठोसेघर या पर्यटनस्थळी भेट देत असतात. सज्जनगड पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेले ठोसेघर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे.
सज्जनगड वरुन ठोसेघरकडे जाताना बोरणे घाटातून दिसणारे निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे. मात्र, अशा या सुंदर ठिकाणाला गालबोट लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून होत आहे. बोरणे घाटात काही ठिकाणी अज्ञातांनी कचरा आणून टाकला असल्याने याठिकाणी कचर्याचा ढीग निर्माण झाला आहे. हा कचरा नक्की कोणी आणून टाकला, याचा तपास होणे गरजेचे आहे. कारण याठिकाणी वन्य जीवांचाही अधिवास आहे. या कचर्यामध्ये असलेले प्लास्टिक पोटात गेले तर त्या वन्य जिवांच्या जिविताचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. हा कचरा तातडीने उचलून संबंधित विभागाने या कचर्याचे लागलीच विघटन करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटक, निसर्ग प्रेमींनी केली आहे.