काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचे लोक देशाला मागे टाकण्याची, कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत : पीएम मोदी

by Team Satara Today | published on : 12 November 2024


चंद्रपूर :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, राज्यातील प्रचारही शिगेला पोहचला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेत आहेत. आज त्यांची चंद्रपूरच्या चिमूर येथे सभा झाली, ज्यात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पीएम मोदी म्हणाले, "काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचे लोक देशाला मागे टाकण्याची, कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आम्ही कलम 370 रद्द केले आणि जम्मू-काश्मीरला पूर्णपणे भारत आणि भारतीय राज्यघटनेशी जोड.ले पण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आता काश्मीरमध्ये पुन्हा 370 पुन्हा लागू करण्याची भाषा वापरत आहेत. यासाठी त्यांनी तेथील विधानसभेत ठरावही पास केला आहे. हे लोक पाकिस्तानला हवे असणारे काम करत आहेत."

"आपला जम्मू-काश्मीर अनेक दशके फुटीरतावाद आणि दहशतवादात जळत राहिला. मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राचे अनेक शूर जवान जम्मू-काश्मीरच्या मातीत शहीद झाले. कोणत्या कायद्याच्या आडून, कोणत्या कलमाच्या आड हे सर्व घडले? ते कलम 370 होते. हे कलम 370 ही काँग्रेसची देणगी होती. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी तुम्हाला फक्त रक्तरंजित खेळ दिला आहे. पण, भाजप सरकारनेच नक्षलवादाला आळा घातला आहे. आज हा संपूर्ण परिसर मोकळा श्वास घेऊ शकतो," अशी टीका पीएम मोदींनी केली.

ते पुढे म्हणातात, "आता चिमूर आणि गडचिरोली परिसरात नवीन संधी निर्माण होत आहेत. या भागात नक्षलवाद पुन्हा प्रबळ होऊ नये, यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना येथे वर्चस्व गाजवू देऊ नका. आपल्या चंद्रपूरच्या या भागानेही अनेक दशकांपासून नक्षलवादाचा सामना केला आहे. नक्षलवादाच्या दुष्टचक्रामुळे येथे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हिंसाचाराचा रक्तरंजित खेळ सुरूच राहिला, तर येथील औद्योगिक विकास मरून गेल्या."

पीएम मोदी पुढे म्हणतात, "भाजप आणि महायुती सरकार 'सबका साथ-सबका विकास' या मंत्रावर काम करत आहे. मला गरिबांच्या जीवनातील अडचणी समजतात, त्यामुळे तुमचे जीवन सुकर करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करतो. आज मी तुम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एका मोठ्या षडयंत्राबाबत चेतावणी देत ​​आहे. आपल्या देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या 10% च्या आसपास आहे. काँग्रेसला आता आदिवासी समाजाला जातींमध्ये विभागून कमकुवत करायचे आहे. काँग्रेस आमच्या आदिवासी बांधवांची एसटी म्हणून असलेली ओळख नष्ट व्हावी, त्यांनी त्यांच्या बळावर निर्माण केलेली ओळख मोडीत काढावी, अशी त्यांची इच्छा आहे,"

"महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना समृद्ध बनवायचे आहे. आज येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. यासोबतच महायुती सरकार नमो शेतकरी योजनेचा दुहेरी लाभही देत ​​आहे."

"तुम्ही एकजूट राहिला नाही, तुमची एकजूट तुटली, तर तुमचे आरक्षण हिसकावून घेणारी काँग्रेसच पहिली असेल. आपण या देशावर राज्य करण्यासाठी जन्माला आलो, अशी मानसिकता काँग्रेसच्या राजघराण्यात नेहमीच राहिली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, मागासवर्गीय, आदिवासींना पुढे जाऊ दिले नाही.  काँग्रेसच्या या षड्यंत्राला बळी पडू नका, आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती विनंती करतो, एक राहिलो, तर सुरक्षित राहू," असेही मोदी यावेळी म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'ही' अभिनेत्री आता 'वीर मुरारबाजी' मध्ये पुन्हा सोयराबाई म्हणून दिसणार
पुढील बातमी
डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का?

संबंधित बातम्या