सातारा : दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.
दिनांक 5 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त अंदाजानुसार, सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 5 व 6 जुलै 2025 रोजी *ऑरेंज अलर्ट* देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ, पूलावरून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. शार्टकट मार्ग म्हणून धोकादायकरित्या पाण्यातून प्रवास करु नये. नियमित रस्ताही पाण्याखाली गेला असल्यास पोलीस व तालुका प्रशासन यांना तात्काळ अवगत करावे. आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये. सर्व नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, सतर्क रहावे, असे आवाहन संतोष पाटील यांनी विद्यार्थी, पालक तसेच जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.