सातारा : गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभाग यांच्या संयोजन मधून सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी पीक विमा घेतला. परंतु झालेल्या नुकसानीचा विचार करता जिल्ह्याला 115 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी केवळ 75 कोटी रुपये विमा कंपनीकडून वाटण्यात आले. उर्वरित जवळ जवळ 40 कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवण्यात आली. हे पैसे येत्या आठ दिवसात द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करू, असा इशारा उबाठा गटाचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
पोवई नाका येथील विमा कंपनीच्या व्यवस्थापनाला भेटून मोहिते यांनी थकित विमा रकमेची विचारणा ओरिएंटल विमा कंपनीच्या आधिकार्यांना केली. शिवसेनेच्या निवेदनात नमूद आहे की 115 कोटी रकमेपैकी केंद्रशासन, व विमा कंपनी यांनी आप आपला हिस्सा दिलेला असून गेली 1 वर्ष पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी राज्य शासन त्याचा हिस्सा देत नाही. यासाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगण्यात येते. तदनंतर या बाबतीत कृषी विभाग यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते देखील वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे परंतु निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले, त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सचिन मोहिते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, एकीकडे अनेक नवनवीन योजना आणून शासन लोकांना खुश करीत आहे. आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र अत्यंत अडचणीत असल्याचे चित्र आहे. येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत विमा रकमेचे वाटप झाले नाही तर शिवसेना रस्ता रोको करणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अजय सावंत, तानाजी चव्हाण, राम साळुंखे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
पीक विम्याचे पैसे आठ दिवसात द्या, अन्यथा रास्ता रोको
उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा इशारा
by Team Satara Today | published on : 27 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा